26 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - उजनीच्या पाण्याची 'धग' वाढली...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. प्रत्येक गावात उभारणार ३० बेडचे कोविड सेंटर
ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी मिळणाऱ्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे हा निधी दिला जातो. या निमित्ताने ग्रामपंचायतींना वेगळा निधी देण्याऐवजी त्यांना मिळणाऱ्या निधीतूनच तजवीज करण्यात आली आहे.
2. सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली
मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये असलेल्या नर्मदा नदी पुलावरून एका विवाहित महिलेनं उडी घेतली. पती, सासू आणि दोन वर्षांच्या मुलीसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला. मात्र सगळं काही अतिशय वेगानं घडल्यानं महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना काहीच करता आलं नाही.
3. उजनीच्या पाण्याची 'धग' वाढली
उजनी धरणक्षेत्र परिसरातील पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला आहे. अवर्षणप्रण क्षेत्रातील आणि रखडलेली म्हणून इंदापूर तालुक्याला मंजूर झालेली योजना पाणी वाटप योजनेत बसत नसल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधाने रद्द झाली आहे. या योजनेचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे
4. गुप्त बैठका दोनशे लोकांसमोर विश्रामगृहावर होत नसतात - उदय सामंत
गुप्त भेटी या दोनशे लोकांसमोर होत नसतात. पण, ज्यांना कोकणाने दोन वेळा नाकारले त्यांनी माझे राजकीय अस्तित्व अस्थिर करण्यासाठी गुप्त भेट झाल्याचे ट्विट केले आहे. पण, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. तुमची दखल जनतेने घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते नीलेश राणे यांना टोला लगावला.
5. होम क्वारंटाइनऐवजी कोविड सेंटरवर भर!
राज्यात सरासरीपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरणाऐवजी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यावर भर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
6. नोकरभरतीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात मंत्रिमंडळासमोर
सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरभरतीत प्रभावित झालेल्या मराठा उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिल्याचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. हा विषय पुढील आठवड्यातच मंत्रिमंडळासमोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
7. 'निसर्ग'च्या धर्तीवर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत
राज्याच्या सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
8. लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोट्यवधींचे घबाड
घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला आरे दुग्ध डेअरीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नथू विठ्ठल राठोड याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बेकायदा जमविलेल्या रकमेबाबत एसीबी अधिक तपास करत आहे.
9. कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून संक्रमणाचा धोका किती वेळ राहतो?
आता दिल्लीतील प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती काळ कोरोनाचे विषाणू सक्रीय असतात त्यावर रिसर्च केला आहे.ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे फॉरेन्सिक हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी म्हटलं आहे की, एका संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर १२ ते २४ तासानंतर कोरोना विषाणू नाक आणि घशात सक्रीय राहत नाही.
10. एका मशिदीत सुरू केलं कोरोना सेंटर
काही लोक असेही आहेत जे धर्माच्या वर जाऊन माणुसकीचा धर्म निभावतात. अशीच एक घटना हैद्राबादहून समोर आली आहे. इथे एका मशिदीला कोरोना सेंटर करण्यात आलं आहे.ही मशीद हैद्राबादच्या राजेंद्रनगरमध्ये आहे. या मिशिदीत एक शाळाही आहे. मिशिदीचं नाव आहे मस्जिद-ए-मोहम्मदी. या मशिदीत सध्या ४० बेडचं एक कोरोना आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आलं आहे.
No comments
Post a Comment