25 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी द्या!...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून शिक्षण सेतू अभियान राबविण्यात येणार आहे. कोरोनाकाळात शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे सेवाआभावी शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यामागील मूळ उद्देश असणार आहे.
2. लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी द्या
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची अनुमती मुंबई व एमएमआर क्षेत्रात दिली जाणार नसल्याची माहिती, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिली. लोकल सुरू न केल्याने गर्दी टाळता आली व कोरोनाचा संसर्ग न होण्यात त्याची मोठी मदत झाली, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मात्र ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना लोकल आणि मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मनसेने केली आहे.
3. सरकारी वकिलांचा आरोपींच्या जामिनाला विरोध
अश्विनी बिद्रे हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील ऊर्फ ज्ञानदेव पाटील, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांनी उच्च-न्यायालयाच्या कोरोना गाईडलाईनप्रमाणे जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सोमवारी पनवेल सत्र न्यायालयात याबाबत युक्तिवाद करण्यात आला.
4. वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसह उर्वरित मागण्यांसाठी सोमवारपासून पुकारलेले आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीकडून देण्यात आली.
5. आईच्या मरण यातना अनुभवण्यासाठी माऊंट एव्हरेस्टची चढाई
मृत्यूसमई आईला झालेल्या यातना आपण देखील सोसाव्यात या भावनेतून पोलीस अधिकाऱ्याने माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. चार वर्षापूर्वी ते माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे याच एव्हरेस्टच्या टोकावरून आईला श्रद्धांजली वाहण्याचा अनोखा संकल्प त्यांनी मनाशी केला होता.
6. नक्षलवादाचे नियंत्रण महाराष्ट्राला जमले, छत्तीसगडला का नाही?
राज्यात नक्षल्यांविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात येत असली तरी छत्तीसगड राज्यात वाढलेला या चळवळीचा जोर महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे नक्षलवाद नियंत्रणात आणण्यासाठी जे महाराष्ट्राला जमले ते छत्तीसगडला का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
7. २७ किंवा २८ मे रोजी खा. संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार
सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभर दौरा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होईल. त्यानंतर आरक्षणप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, अशी घोषणा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
8. भुकेले जीव, रुग्णांसाठी धावून आले 'सेवा किचन'
भुकेल्या व्यक्तीच्या पोटात दोन घास जावेत यासाठी धडपड करतो, तो खरा माणूस. कोरोनामुळे आधीच नागरिकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना दोन वेळच्या भोजनासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.
9. शेतात राहून कोरोनावर मात
उस्मानाबादमध्ये एक प्रेरणादायी घटना घडली आहे . दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे, योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत मन आनंदी ठेवत शेतात लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत एका सैनिकाच्या ६५ वर्षीय मातेने दहा दिवसात कोरोनाला हरवले. बालिका ज्ञानेश्वर यादव त्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
10. कोरोना मुक्तीनंतरही बारा आठवडे काळजीचे
कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्येतीची नीट काळजी घेण्याकडेही रुग्णांनी लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
No comments
Post a Comment