Breaking News

1/breakingnews/recent

23 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

       News24सह्याद्री - गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिला इशारा..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. आसमामध्ये एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दिले संकेत
आगामी काळात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तसे संकेत दिले आहेत.

2. गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिला इशारा
लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करत असाल, तर खबरदार… कारण लॉकडाउनबद्दलच्या मेसेजमुळे तुम्हाला पोलिसी कारवाईला सामोर जावं लागू शकतं. हो, हे खरं असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

3. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांचे पेजेस फेसबुकवर पुन्हा दिसणार
शुल्क आकारण्याच्या आपल्या नव्या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी ऑस्ट्रेलिया सरकारने दर्शवल्यानंतर अखेर फेसबुकनेही नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रस्तावित नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. या मीडिया लॉवरुन फेसबुकचा ऑस्ट्रेलिया सरकारशी संघर्ष सुरू आहे.

4. २६ जानेवारी हिंसाचार प्रकरणी २ प्रमुख आरोपींना अटक
२६ जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २ प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामध्ये ४५ वर्षीय मोहिंदर सिंग आणि ३० वर्षीय मनदीप सिंग या दोघांचा समावेश आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांना जम्मूमधून अटक करण्यात आली आहे. 

5. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामागे काय आहे कारण ?
पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

6. छाप्याच्या भीतीने साठा लपवत असताना स्फोट
कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. यात सहा जणांचा मृत्यू आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

7. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे
भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांचं विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे.

8. "माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार"
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असणारे संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं आहे. संजय राठोड पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

9. खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह
मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले.

10. दिग्विजय सुर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. या विजयाबरोबरच सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वाक्याची आठवण विरोधकांना करुन दिली जात आहे. ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ या वाक्याचा आज प्रत्यय आला असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांकडून सांगितलं जात आहे.  सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *