कोरोना लस घेतल्यावर बिनधास्त फिरता येणार का ?: राजेश टोपेंनी दिली माहिती
मुंबई । वृत्तसंस्था -
देशात कोरोनाचा कहर अजून ही पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,05,788 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,49,218 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा हाच संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केंद्र आणि राज्यसरकार कडून केले जात आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी अंतर्गत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज (दि. २) पासून कोरोना लसीचे 'ड्राय रन' केले जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 'ड्राय रन' घेतला आहे. .
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि, 'लसीकर करताना प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील. त्या ठराविक तापमानात ठेवण्यात आलेली लस संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील. त्यानंतर त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवले जाईल. काही व्यक्तींना ताण-तणावाची समस्या असते. तर काही जणांना लगेच भोवळ येते. असा काही प्रकार घडल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा उपलब्ध असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीचे निरीक्षण करण्याचे काम आशा वर्कर्स, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतील.
तसेच कोरोनाची लस घेतल्यानंतर बिनधास्त फिरता येईल, असा अनेकांचा समज झालेला आहे. याबद्दलची शंकादेखील टोपेंनी दूर केली आहे. कोरोनाची लस घेतली की निर्धास्तपणे फिरायला मोकळे, असे अनेकांना वाटू लागले आहे. पण कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळणे गरजेचे आहे. असे सुद्धा राजेश टोपे पुढे म्हणाले आहे.

No comments
Post a Comment