अजूनही वेळ गेलेली नाही: उद्धवजी फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा
चंद्रकांत पाटील यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कामाला स्थगिती दिल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना मेट्रो कारशेडबद्दल भाष्य केले होते. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. टीम इंडिया असे समजून काम करा कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेल. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे.
तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता. पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे

No comments
Post a Comment