एखाद्याला बदनाम करणे, त्रस्त करुन सोडणे हा प्रयत्न काही जण करत आहे - जयंत पाटील
मुंबई -
संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटिस पाठवली आहे त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला. दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे, जे बोलत आहे, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असे वाटते. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणे, त्रस्त करुन सोडणे हा प्रयत्न काही जण करतायत. हे देशातल्या जनतेला कळले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील म्हणाले.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असताना जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी ईडी आणि वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी “राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार. ते खरं आहे” असे उत्तर दिले.

No comments
Post a Comment