एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही, एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल : रोहित पवार
News24सह्याद्री -
मुंबई -
भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी 'मराठा समाजाचे आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत' असा गंभीर आरोप केला आहे. तसेच , मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही, तर शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारित समाजाच्या भूमिकेतून बोलत आहे. आपल्या आधीची जी पिढी राजकारणात आहे त्यांना मला प्रश्न वाचारायचा आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? इतरांचा अधिकार कमी करा अशी मागणी मराठा समाजाने कधीच केली नाही. पण आमच्यावर अन्याय का? ज्यांनी अन्याय केला ते आज सत्तेत आहेत. अन्य समाजाचे आरक्षण, अधिकार अबाधित ठेवा. पण मराठा समाजावर अन्याय का?, आज जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे असा आरोप उदयनराजेंनी केला होता.
दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलत असताना म्हटले आहे की, “ते नेमके काय बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. कोणाला श्रेय घ्यायचे नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्ग लागेल असा विश्वास आहे,” असे रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे.

No comments
Post a Comment