रझा अकादमीचे राज्यपालांना पत्र :राजभवनातील मशीद नमाजासाठी खुली करा
मुंबई
रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी केली आहे. राज्यातील प्रार्थनास्थळे दिवाळीमध्ये उघडण्यात आली. सातत्याने मागणी होत असल्याने राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आल्यानंतर रझा अकादमीने यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिले. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
तर राजभवनाने या प्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला आहे. राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात म्हटले आहे. मात्र, मुस्लीम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावे म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आलेली होती. त्यामुळे बाहेरून येणारे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करायचे. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. शुक्रवारी बाहेरील लोक येथे नमाजासाठी यायचे. परंतु, करोनाच्या काळात गर्दी वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.
रझा अकादमीचे महासचिव एम. सईद नुरी यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिले आहे. राजभवनातील कर्मचाऱ्यांना मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ पाच ते सात लोकांना नमाजसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आमची विनंती आहे की तात्काळ आदेश काढून कर्मचाऱ्यांना करोनापूर्वीप्रमाणेच नमाज पठण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असे म्हंटले आहे.

No comments
Post a Comment