राज्यभरात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिला सक्त आदेश
मुंबई
आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना दिली. वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक झाली असून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला असून.
आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचे आहे. सोशल डिस्टन्सिंगच पालन करायचे आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”.पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईसंबंधी बोलताना ते म्हणाले आहे की, “पोलिसांना त्यांचे काम करावे लागणार आहे. लोक मरण्यापेक्षा वाचलेली बरी म्हणून ते आमची काळजी घेत आहेत. उलट आम्ही त्यांचे आभार मानतो.
पण आम्हीदेखील स्वत:च्या जीवाची काळजी घेत आहे.‘हा सामान्यांच्या नेतृत्वाचा मोर्चा आहे त्यामुळेच शांत आहे. यानंतर सरकार काहीतरी निर्णय घेईल,” अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज ठाकरे पुढील भूमिका जाहीर करतील असेही ते म्हणाले. ज्यांना वीज बिलाचा शॉक बसला आहे, अशा सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने मनसेने दादर, माहीम परिसरात राज्य सरकारच्या घोषणेवरुन टोला लगावत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’ असे होर्डिंग लावले होते. राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून वाढीव वीजबिलाचा मुद्दा मांडला आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. पण अद्यापही तोडगा न निघाल्याने मनसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

No comments
Post a Comment