उद्धव ठाकरेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई
आजीच्या एका इच्छेसंदर्भात भाष्य करत उद्धव ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांपासून केंद्र सरकारपर्यंत आणि कंगनापासून ते शरद पवारांवर झालेल्या टीकेसंदर्भात अनेक गोष्टींवर भाष्य केले. मात्र मुलाखतीमधील एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आजीची म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आईची आठवण झाली.
मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि हा एका वर्षातील प्रवास यासंदर्भात काय सांगाल अशा आशयाचा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देताना उद्धव यांनी परिस्थितीमुळे आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागल्याचे म्हटले. “मी प्रामाणिकपणे सांगतो की एक वर्ष पूर्ण झाले. मी शासन प्रशासन या पठडीतला नाही. आमची ही म्हणजेच आदित्यची सहावी पिढी आहे जी महाराष्ट्राची सेवा करत आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याचबद्दल बोलताना उद्धव यांनी पुढे आपल्या आजींचा उल्लेख केला. “मी माझ्या आजीला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या आईला कधी बघितले नव्हते. माझे आजोबा सांगायचे किंवा बाळासाहेबही सांगायचे की त्या आजीला असे वाटायचे की आपल्या मुलाने गव्हर्मेंट सर्व्हंट व्हावे. माझ्या आजीच्या मुलाने सरकार स्थापन केले आणि तिचा नातू सरकार चालवतोय. हा असा सगळा योगायोग आहे,” असे वक्तव्य उद्धव यांनी आजीच्या इच्छेसंदर्भात माहिती देताना ते म्हणाले.

No comments
Post a Comment