मुख्यमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा; सचिन वाझेवरून उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई -
वाझेवरूनमुंख्यमंत्र्यावर टीका केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने काल रात्री पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्याने पोलीस दलात आणि राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वाझेंवर झालेल्या कारवाईमुळे या प्रकरणात सचिन वाझेंचा बचावर करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांची कोंडी झाली आहे. तर सुरुवातीपासूनच वाझेंवरील कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाचे नेते या प्रकरणात आता अधिकच आक्रमक झाले आहेत. सचिन वाझे हे लादेन आहेत का? असे विचारणारे मुख्यमंत्री कुठे आहेत, असा सवाल भाजपा नेते निलेश राणे यांनी विचारला आहे. निलेश राणे म्हणाले की, सचिन वाझे हे लादेन आहेत का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? दहशतवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.
गेल्या महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानापासून जवळच जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ सापडली होती. दरम्यानच्या काळात सदर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून विधानसभेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची काल एनआयएने दिवसभर चौकशी केली आणि रात्री त्यांना अटक केली. आज वाझे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून, आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिले असल्याची माहिती राज्यातील भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
No comments
Post a Comment