Breaking News

1/breakingnews/recent

18 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

        News24सह्याद्री - ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच एक नंबरचा पक्ष....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. प्रजासत्ताक दिनी दिल्ली पोलीस शेतकऱ्यांना रोखणार
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. २६ जानेवारीला काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार नाही अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारे मेळावे आणि समारंभांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. याप्रकरणी पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

२. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मोदी सरकारवर टीका
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झालाय.  देशात विरोधी पक्षांकडून या संवादाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे,” असं विधान खान यांनी केलं आहे.  

३. राम शिंदेंचा पराभव केल्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये  राम शिंदेंचा पराभव केल्यानंतर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “ग्रामपंचायतीमध्ये कोणताही झेंडा किंवा चिन्ह घेऊन लढत नसतो, तिथे कार्यकर्ते असतात. काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या विचाराचे कार्यकर्ते एकत्र आले आणि चांगली ताकद लावली. त्यातूनच हा विजय झाला आहे. पुढील काही दिवसांत एक नंबर, दोन नंबर कोण या गोष्टी कळतील. आज हे सांगणं योग्य नाही. पण काम करताना सर्वांना सोबत आणि विचारात घेऊनच काम करावं लागेल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे..

४.कल्याणमध्ये लहान मुलाने घोषित केला उमेदवार 
कल्याण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान एका जागेसाठी दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली. पण अखेर एका लहान मुलाने शिवसेनेच्या पारड्यात यश दिलं आहे. दोन्ही उमेदवारांना समान मत पडल्याने गावात एकच गोंधळ उडाला. पण यासाठी चिठ्ठी उचलून विजयी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे एका लहान मुलाने चिठ्ठी उचलली आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून आलाय.  

५. मांजाने कापला पोलिसांचा गळा
दुचाकीवरुन जाणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा गळा नायलॉनच्या मांजामुळे चिरला असल्याची घटना मुंबई भायखळा परिसरात घडली आहे. वेळेत उपचार मिळाल्याने उपनिरीक्षक बचावले आहेत.  त्यांच्या  गळ्याला दहा टाके पडले असून पुढील उपचार सुरू आहेत.

६. 
माळशिरस मध्ये 'गड आला पण सिंह गेला'  
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली आहे. माळशिरसमध्ये 44 पैकी 35 ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटलांनी वर्चस्व राखलं आहे.भाजप पॅनलचे प्रमुख उमेदवार व विजयसिंह मोहिते यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपची 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था झाली आहे.

७. अखेर मनसेचं इंजिन दुपार नंतर धावलं 
ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या  सकाळच्या सत्रात खातेही न उघडू शकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  इंजिन दुपारनंतर जोरात धावायला लागले आहे. यवतमाळमध्ये तर मनसेला घवघवीत यश मिळाले आहे.  वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो.इथल्या 15 ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेने जिंकलेल्या 15 ग्रामपंचायतींमध्ये शिरपूर, मोहूर्ली, येनक, खांदला, खांदला, चंडकापुर, बाबापूर, मोहदा, शिंदी, माहागाव , गदाजी बोरी, करणवाडी या गावांचा समावेश आहे .

८.ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन व संजना यांना जोरदार धक्का 
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पुत्र आदित्यनं स्वत:च्या आईविरोधात पॅनल उभं केलं होतं. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यनं स्वतः सर्व सूत्रं हातात घेतली. मात्र या निवडणुकीत जाधव यांच्या पॅनलला फारसं यश मिळालेलं नाही. त्यांच्या आई संजना यांनादेखील फारशी चमक दाखवता आली नाही.पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत  हर्षवर्धन जाधव यांना १७ पैकी ४ जागा जिंकता आल्या. तर संजना जाधव यांना केवळ २ जागा मिळाल्यात .

९. मुख्यमंत्र्यांना हवा आहे अपघातमुक्त महाराष्ट्र 
“सध्या महाराष्ट्र रस्ते अपघातात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे,” असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्धाटन केले. या उद्धाटनावेळी भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.   

१०.ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच एक नंबरचा पक्ष 
संपूर्ण राज्याचं लक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम निकालांकडे लागलं असताना माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो  हे मोठे यश असल्याचे ते यावेळी म्हणालेत. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *