खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय: शेलारांनी काढला राऊतांना चिमटा
मुंबई -
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर भाजपाविरोधात हल्लाबोल केला आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. त्याचबरोबर सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण डागले. आशिष शेलार यांनी चिमटे काढत संजय राऊत यांच्या होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर नामोल्लेख न करता निशाणा साधला आहे. “प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत.
चला हवा येऊ द्या!,” असे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना नाव न घेता लक्ष्य केले आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यावरून सध्या शिवसेना-भाजपा यांच्यात आरोप आणि टीकेच्या फैरी झडत आहे. वर्षा राऊत यांना नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी मोदी सरकारसह महाराष्ट्र भाजपावर टीका केली होती. भाजपाकडून राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

No comments
Post a Comment