भाजपा नेत्याचा राऊतांना टोला
मुंबई
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. “आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा,” असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले होते.“सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू हे बच्चन स्टाईल बोलबच्चन ऐकून हल्ली लोकांचे मनोरंजन सुद्धा होत नाही. शेवटाची चिंता करू नका, महाराष्ट्राची जनता तुमच्या खोटारडेपणाचा व्यवस्थित शेवट करेलच, त्याची सुरुवात झालेली आहे. २०२२ मध्ये ट्रेलर पाहायला मिळेलच,” असे म्हणत भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला.
“काही झाले तरी आमचे हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. यंत्रणांचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमच सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

No comments
Post a Comment