अलिबागमध्ये हजारो शेतकरी-कामगारांचा मोर्चा ; शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे मागे घ्या
मुंबई
केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे मागे घ्यावेत. अलिबाग शहरातील शेतकरी भवनपासून मोर्चाला सुरूवात झाली.कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवावे, प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट आधारभूत किंमत मिळावी, कमाल जमीन धारणा कायदा कायम ठेवावा या व इतर मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमधून आलेले दोन हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. एसटी स्टॅड, महावीर चौक, बालाजी नाका, मारूती नाका मार्गे मोर्चा जनरल अरुण कुमार वैद्य शाळेजवळ दाखल झाला. शाळेजवळ पोलीसांनी मोर्चा अडवला.
या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेला आमदार जयंत पाटील यांच्यासहीत शेकाप नेत्यांनीही आंदोलकांना संबोधित केले. यानंतर पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना ३८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, आमदार बाळाराम पाटील, प्रितीम म्हात्रे, अँड. सचिन जोशी उपस्थित होते.मोर्चाच्या पार्श्वभुमीवर पक्षाने रायगड बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र रिक्षा वाहतूक आणि एसटी बस सेवा सुरु होती. बँकाचे व्यवहार सुरळीत सुरु होते. या मोर्चात दहा ते बारा हजार कार्यकर्ते सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सुमारे दोन हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

No comments
Post a Comment